रघुनाथ अनंत माशेलकर





साधारणपणे १९५० ते १९६० या दशकातली घटना! मुंबईच्या युनियन हायस्कूल या शाळेत घडलेली. शाळा तशी गरीब परिस्थितीतली, पण तिथले शिक्षक मात्र श्रीमंत! धनाने नव्हे बरं ज्ञानाने. तिथेच भावे सर पदार्थविज्ञान शिकवायचे. प्रयोग करुन, विद्यार्थ्यांना अनुभव देऊन शिकवण्यावर त्यांचा विश्र्वास होता. साबण कसा करायचा, हे पाठ करुन परीक्षेत लिहिलं तर पूर्ण गुण मिळतात हे माहिती असून त्यांनी मुलांना, शिवडीला हिंदुस्तान लिव्हरचा साबणाचा कारखाना बघायला नेलं होतं. एकदा बहिर्गोल भिंगाविषयी शिकवतांना, त्यांनी सर्व मुलांना शाळेबाहेर उन्हात नेलं. भिंग खालीवर करुन, कागदावर एक प्रखर बिंदू मिळवला. त्यावर सूर्यकिरण एकवटले गेले होते.कागद जळू लागला. त्या क्षणी भावे सरांनी, आपल्या एका बुद्धिमान विद्यार्थ्याला हाक मारली, 'माशेलकर, तूही जर या भिंगाप्रमाणे, तुझ्यातल्या सर्व शक्ती एकवटल्यास तर जगात काहीही मिळवू शकशील.' या घटनेने, जीवनात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली माशेलकरांच्या ओंजळीत पडली आणि माशेलकरांसारखा एक प्रतिभावंत वैज्ञानिक भारताच्या ओंजळीत! सूर्यकिरणं समांतर जाऊ दिली तर त्यांच्यात प्रचंड शक्ती असूनही त्याचा वापर होत नाही. ही शक्ती एकवटली तर मात्र किमया घडवू शकते, हे तत्वज्ञान, छोटया रघुनाथच्या मनात खोलवर रुजलं. पुढे हेच रघुनाथ माशेलकर, सी. एस. आय. आर. चे प्रमुख झाले. प्रमुखपदाची सूत्रं हातात घेतली, तेव्हाही त्यांच्या मनात हीच भिंगाची घटना घुटमळत होती. त्या वेळी सी. एस. आय. आर. मध्ये २८,००० लोक कार्यरत होते. देशभर जागोजागी प्रयोगशाळा वसवल्या होत्या. परंतु त्या अपेक्षितपणे काम करत नव्हत्या. माशेलकरांनी व्हिजन नावाची योजना आखली. चाळीस प्रयोगशाळांचं समातंर चालणं थांबवून, त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ठ पद्धतीने बांधलं आणि मग त्यातून निर्माण झालं, भारतीय वैज्ञानिक संशोधनाचं एक अचाट पर्व! एका सृजनशील शिक्षकाने, एका विध्यार्थ्याला दिलेल्या गुरुमंत्राने, भारताच्या प्रगतीच्या इतिहासात मोलाची कामगिरी घडवली.

मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचं आयुष्य घडवलं. त्यांच्या आई, हे त्यांचं प्रमुख प्रेरणास्थान!

रघुनाथ माशेलकरांचा जन्म कोकणातल्या माशेल गावाचा. बालपण मुंबईत गेलं. मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचं आयुष्य घडवलं. त्यांच्या आई, हे त्यांचं प्रमुख प्रेरणास्थान! शिवणकाम किंवा मिळेल ते काम करुन माशेलकरांच्या आई काही कमाई करत असत. एकदा त्या गिरगावातल्या काँग्रेस भवनात काम मागण्यासाठी गेल्या. संबंध दिवस तिथे उभं राहूनदेखील त्यांना काम दिलं गेलं नाही. त्या कामासाठी तिसरी उतीर्ण असणं आवश्यक होतं आणि माशेलकरांच्या आईंचं तेवढं शिक्षण नव्हतं. खोटं बोलून त्यांना कदाचित ते काम मिळवता आलं असतंही. पण तसं न करता, त्यांनी स्वतःच्याच मनाशी निर्धार केला - आज माझं शिक्षण नाही म्हणून मला काम मिळालं नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी जगातलं सर्वोच्च शिक्षण देईन. हा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ठ घेतले. अकरावीच्या परीक्षेत रघुनाथ माशेलकर बोर्डाच्या मेरिटमध्ये आले. पण परिस्थितीमुळे त्यांनी पुढे न शिकण्याचं ठरवलं. इथेही आईच्या आग्रहामुळे त्यांनी बी. केम. ला प्रवेश घेतला आणि १९६९ साली मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या तत्कालीन संचालक प्रा. एम्‌. एम्‌ शर्मा या अत्यंत सृजनशील संचालकाच्या मार्गदर्शनाखाली, माशेलकरांनी आपली पी.एच.डी. ची पदवी प्राप्त केली. युरोपमधील सल्फोर्ड विद्यापीठात जाऊन पोस्ट डॉक्टरल संशोधनही केलं.


आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारा, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारा हा माणूस, पुढे, इंग्लंडमध्ये, जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारा पहिला महाराष्ट्रीय ठरला.डॉ. माशेलकरांचा उल्लेख आला की त्याबरोबर लगेचंच आठवते ती त्यांनी जिंकलेली आगळीवेगळी हळदीघाटची लढाई! आपल्या सवानाच हळदीचे औषधी गणुधर्म माहिती आहेत. जखम झाल्यावर त्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय, आपल्या देशात पूर्वापार वापरला जातोय. असं असतांना, एक दिवस सकाळी पेपर वाचत असतांना, एका विचित्र बातमीनं डॉक्टरांचं लक्ष वेधलं. अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याचं त्या बातमीत म्हटलं होतं. थोडक्यात अमेरिकेने हळदीचं पेटंट घेतलं होतं. बातमी वाचताच माशेलकर बैचेन झाले.

आपल्याकडे अनेक पिढया चालत आलेलं हे ज्ञान, कोणीतरी स्वतःचं असल्याचा राजरोस दावा करतोय, हे योग्य नव्हे. यावर अमेरिकेशी न्यायालयीन लढाई करुन आपले हक्क आपण राखले पाहिजेत, असा पक्का विचार करुन डॉक्टर कामाला लागले. जोरदार न्यायालयीन लढाई झाली. हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ, अनेक कागदपत्रं जमा करुन, त्या सर्वांचा अभ्यास करुन, डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही अमेरिकेविरुद्धची हळदीघाटची लढाई जिंकली. यातून दोन चांगले परिणाम झाले. एक तर आपल्या ज्ञानाचे हक्क आपल्याकडे राहिले आणि दुसरा दूरगामी फायदा झाला. तो असा की आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत आपल्याला आणि सार्‍या जगाला कळली. अमेरिकेसारख्या बलाढय राष्ठ्राला भारतीय ज्ञानाचं महत्त्व कळलं आणि आपण दुसर्‍यांच्या ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडाही मिळाला. हाच प्रकार बासमती तांदळाच्या बाबतीतही घडला. त्याचेही पेटंट माशेलकरांनी परत मिळवले. सर जगदीशचंध बोस यांनी बिनतारी संदेश यंत्रणेचा म्हणजे वायरलेसचा शोध लावला, पण त्या शोधाचं श्रेय मात्र मार्कोनीला मिळालं. कारण बोस यांनी पेटंट घेतलं नाही, ते सर्व करुन मार्कोनीने सर्व अधिकार स्वतःकडे घेतले. १८९८ मध्ये बोस यांनी वायरलेस शोधलं होतं.


त्यानंतर १९९८ साली म्हणजे बरोबर १०० वर्षांनी बासमतीची लढाई जिंकून त्याचंही पेटंटं डॉ. माशेलकरांनी मिळवले. बोस ते बासमती अशा या ज्ञानाचा हक्क मिळवण्याच्या प्रवासात डॉ. माशेलकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ओषधांपासून ते खतांपर्यंत, जीवनोपयोगी रसायनांपासून ते गृहिणींसाठी छोटे उद्योग वसवून देण्यापर्यंत, अनेक लहान मोठया व्यवसायात डॉ. रघुनाथ माशेलकरांनी मार्गदर्शन केलं. व्यवस्थापनापासून ते स्वतः प्रयोगशाळेत संशोधन करण्यापर्यंत जातीने काम केलं आणि आजही ते तितक्याच जोमाने कार्यरत आहेत. सकारात्मक विचारांचा प्रचंड उस्फूर्त असा प्रवाह अनुभवायचा असेल तर, डॉ. रघुनाथ माशेलकरांच्या सहवासात आयुष्यातले काही क्षण तरी घालवावेत; ते शक्य नसेल तर त्यांचे भाषण जिथे कुठे असेल तिथे ऐकायला जावं. तेही शक्य नसेल तर त्यांनी लिहिलेले भारताच्या प्रगतीच्या कल्पनांविषयीचे लेख वाचावेत. आणि मग आपल्या लक्षात येईल की, जगद्विख्यात रसायनशास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे, जबरदस्त सकारात्मक विचारांच्या मुशीतून घडलेलं, काही एक वेगळंच रसायन आहे.

भारताच्या अतिप्रचंड लोकसंख्येबद्दल आपण सर्वच जण चिंता व्यक्त करत असतो. पण त्याहीकडे पाहाण्याचा माशेलकरांचा दृष्ठीकोन आपल्याला, त्यांच्या सकारात्मकतेचं दर्शन घडवतो. ते म्हणतात, 'भारताची भव्य लोकसंख्या हाच एक मोठा खजिना आहे. भारतात वैचारिक स्वातंत्र्य असल्यामुळे जेवढी माणसं जास्त, तेवढया नवनवीन कल्पना पुढे येण्याला वाव. त्यातच भारतातली ५५ टक्क्याहून जास्त मंडळी तिशीच्या घरातली आहेत. म्हणजे हा तरुणांचा देश, अनेक नवनवीन धडाडीची कामं करु शकेल. आणि भारतातली सांस्कृतिक विविधता देशाला अधिक सृजनशील बनवेल. 'मराठीवर मनापासून प्रेम करणारे, मायबोलीतून विचार केल्यामुळे मी यशस्वी झालो' असं सांगणारे डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर, आपल्या तरुणांसाठी, खास करुन मराठी युवकांसाठी स्फूर्तिस्थान ठरावेत! पण हा आहे फक्त ट्रेलर, संपूर्ण चित्रपट ज्याला ज्याला शक्य होईल त्याने जरुर पहावा!

आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारा, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारा हा माणूस, पुढे, इंग्लंडमध्ये, जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारा पहिला महाराष्ट्रीय

No comments:

Post a Comment