वटपौर्णिमा

वटपौर्णिमा - (Vat Pournima) जेष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.
जेष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.
वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला वटवृक्षाची(Banyan Tree) पूजा करतात. हळद-कुंकू हे सौभाग्याच प्रतिक आणि सौभाग्यवतीचे फणी करंडा, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करतात. वडाला पाच प्रदक्षिणा मारून सूत गुंडाळतात. मनोभावे वटवृक्ष राजाचे पुजन करतात. ह्या व्रताशी संबंधीत अशा सावित्रींचे स्मरण पूजन करतात. सावित्री हिने आपला पति सत्यवान ह्याचे प्राण यमाकडून कसे परत मिळवले. ह्या बद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते ती अशी.
सावित्री ही भद्र देशाचा राजा अश्वपती ह्याची कन्या. आपल्या सत्वगुणी समंजस, गुणवान, रूपवान, धैर्यवान आणि सुशील कन्येबद्दल राजा-राणीला मोठा आभिमान होता.
खरं तर अशा ह्या सुंदर राजकन्येला कुणीही एखादा राजकुमार सहज पती म्हणून मिळाला असता पण तसं घडलं नाही तिनं निवड केली ती जंगलात राहणाऱ्या सदाचारणी, सत्यवचनी, सामर्थवान आणि आपले नांव सार्थ करणाऱ्या सत्यवानाची.
सत्यवान हा अल्पायुषी होता. लग्नानंतर तो एक वर्षातच मृत्यू पावेल हे भाकित ठाऊक असून ही सावित्रीनं त्याच्याशीच विवाह केला.
सावित्री सत्यवानाच्या झोपडीत आनंदात राहू लागली. सासू सासऱ्याची सेवा करू लागली. पतीसेवा करू लागली. पतीला त्याच्या कामांत मदत करू लागली.
होता होता एक वर्षाचा काळ होत आला.. आणि तो दिवस उगवला. पहाटे पासूनच सावित्रीला अपशकुन होऊ लागले. तिनं एक वेगळाच निश्चय केला. त्या दिवशी ती मुद्दाम पती बरोबर जंगलांत लाकडं तोडण्यासाठी गेली.
झाडावर चढून सत्यवान लाकडं तोडून खाली टकत होता आणि सावित्री ती लाकडं गोळा करत होती.. आणि एका-एकी घेरी येऊन सत्यवान झाडावरून खाली पडला. सावित्रीनं त्याला एका वृक्षाखाली नेलं व त्या वृक्षाच्या सावलीत ती त्याला सावध करण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात तिथं यमराजाची स्वारी आली आणि सत्यवानाचे प्राण हरण करून घेऊन जाऊ लागली.
तशी सावित्री ही यमराजांचे मागे धावत जाऊ लागली. आपल्या पतीचे प्राण परत मागू लागली. बाळ! मृत्यूच्या मार्गावरचा प्रत्येक जीव हा एकटा असतो. त्याचा कुणी सोबती नसतो. तू परत जा.. यमराज म्हणाले.
तेव्हा पतीवाचून पत्नीने जगावे का? तिच्या जगण्याला काही अर्थ राहतो का? सहगमन हा पत्नीचा धर्म आहे असं शास्त्रच सांगते नां? अशी अनेक प्रश्नोत्तरे करून सावित्रीने अखेर यमराजाचे मन जिंकले.
तिचा निश्चय, धैर्य, धर्म शास्त्राच ज्ञान, तिच बुद्धी कौशल्य, चतुराई हे सारं पाहून यमराज प्रसन्न होऊन म्हणाले,"सावित्री, एक लक्षांत ठेव. केवळ पतीचे प्राण सोडून हवे ते माग, मी ते देईन. बोल काय हवे तुला".
मग सावित्रीने चतुराईन यमाकडे सासऱ्याचं गेलेल राज्य मागितले. यम हो म्हणाले, सासू-सासऱ्यांना दृष्टी मागितली, यमराजाने ती दिली. असं एक-एक मागता-मागता सावित्रीने पुत्र मागितला. यमराज इतर मागण्यांप्रमाणे हो म्हणाले आणि..
दिल्या शब्दाप्रमाणे पुत्रप्राप्तीसाठी यमराजांना सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले.
ही पौराणिक कथा खरंच श्रवणीय आणि बरंच काही शिकवून जाणारी आहे. त्या कथेच स्मरण वटवृक्षाचे पूजन आणि सौभाग्य वरदान मागण्याचा हा दिवस.

#Vatpaurnima #vadpaurnima #वटपौर्णिमा

No comments:

Post a Comment