वेगळं राहायचं सुख ।
ऊन ऊन खिचडी, साजुकसं तुप,
वेगळं राहायचं भारीच सुख !
एक नाही दोन नाही माणसं बारा,
घर कसलं मेलं ते बाजारच सारा.
सासुबाई- मामंजी,नणंदा नी दीर,
जावेच्या पोराची सदा पीर पीर.
पाहुणे रावळे सण नी वार,
रांधा वाढा जीव बेजार.
दहा मध्ये दिलं ही बाबांची चुक,
वेगळ राहायचं भारीच सुख!
सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ,
प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासू,
अन् एवढासा जीव झाला तरी विंचु तो विंचु.
चिमुकली नणंदबाई चुगलीत हलकी,
वीतभर लाकडाला हातभर ढलपी.
बाबांची माया काय मामंजीना येते ?
पाणी तापवलं म्हणुन साय का धरते?
बहीण अन् जाऊ यात अतंरच खुप,
वेगळं राहायचं भारीच सुख !
दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा,
दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा.
दोघांनी रहायचं, छान छान ल्यायचं,
गुलुगुलु बोलायचं नी दुर दुर फिरायचं .
आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी,
फिटतील सा-या आवडी निवडी.
दोघांचा असा स्वयंपाकच काय?
पापड मेतकुट अन् दह्याची साय ,
त्यावर लोणकढ साजुक तुप,
वेगळ राहायचं भारीच सुख. !
रडले पडले नी अबोला धरला,
तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला.
पण मेलं यांचं काही कळतंच नाही,
महिन्याचा पगार कसा पुरतंच नाही.
साखर आहे तर चहा नाही,
तांदुळ आहेत तर गहु नाही.
ह्यांच्याही वागण्याची त-हाचच नवी,
घोटभर पाणी द्यायला पण बायकोच हवी.
बाळ रडलं तर ते खपायचं नाही,
मिनीटभर कसं त्याला घ्यायचंही नाही.
स्वयंपाक करायला मीच,
बाळ रडलं तरी घ्यायचं मीच.
भांडी घासायची मीच,
अन् ह्यांची मर्जी पण राखायची मीच.
जिवाच्या पलीकडे काम झालं खुप,
वेगळं रहायचं कळायला लागलं सुख. !
सासुबाई रागवायच्या पण ब-याच होत्या,
सकाळचा स्वयंपाक निदान करत तरी होत्या.
मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे,
बाजारहाट करायला भावजी जायचे.
कामात जावेची मदत व्हायची,
नणंद बिचारी ऊर नि पुर निस्तरायची.
आत्ता काय कुठल्या हौशी नी आवडी,
बारा महिन्याला एकच साडी!
थंडगार खिचडी, संपलंय तुप,
अन् वेगळं व्हायचं कळलंय सुख.!!!

No comments:

Post a Comment